मोबाइल कनेक्शन घेणाऱ्यांसाठी एक महत्त्वाची बातमी आहे. तुमच्यासाठी नवीन कनेक्शन खरेदी करणं सोपं व्हावं आणि डिजिटलायझेशनला प्रोत्साहन देण्यासाठी दूरसंचार विभागानं एक नवीन नियम जारी केला आहे. या नवीन नियमानुसार १ जानेवारी २०२४ पासून तुम्हाला मोबाइल कनेक्शन घेताना पेपर केवायसी (KYC) करावं लागणार नाही. म्हणजेच तुम्हाला सर्व आवश्यक माहिती डिजिटल पद्धतीनं सबमिट करावी लागेल.
मिनिस्ट्री ऑफ कम्युनिकेशन अंतर्गत येणाऱ्या दूरसंचार विभागानं एक अधिसूचना जारी केली आहे. यामध्ये १ जानेवारी २०२४ पासून मोबाईल कनेक्शन खरेदी करताना केलं जाणारं पेपर केवायसी बंद केलं जाणार असल्याचं म्हटलंय. याशिवाय मोबाईल कनेक्शन घेण्यासाठी आवश्यक असलेल्या सर्व नियमांमध्ये कोणताही बदल करण्यात आलेला नाही.
सिमबाबत हा नवा नियम
१ डिसेंबर २०२३ पासून देशात सिम कार्डच्या खरेदी-विक्रीशी संबंधित नवीन नियम लागू झाले आहेत. पूर्वी लोक एका आयडीवर एकाच वेळी अनेक सिम खरेदी करायचे. परंतु आता १ डिसेंबरपासून एका आयडीवर मर्यादित संख्येत सिम खरेदी करण्याची परवानगी असेल. तसंच, सिम कार्ड विकणाऱ्यांना नोंदणी करण्यापूर्वी आणि सिस्टममध्ये सामील होण्यापूर्वी केवायसी प्रक्रिया पूर्ण करावी लागेल.