शेतकरी मित्र

कापसाची योग्यप्रकारे कशी साठवणूक कराल?

कापसाला cotton मिळणारा बाजारभाव हा सर्वस्वी कापसाच्या प्रतिवर अवलंबून असतो. कापसाची प्रत राखण्याकरीता वेचणी करतांना काळजी घेणे आवश्यक आहे. वेचणी सुरू झाल्यापासून साधारणतः ३ ते ४ वेचणीत बराचसा कापूस गोला होतो. आपल्याकडे वेचणी करतांना काळजी न घेतल्यामुळे ३० ते ३५ टक्के पालापाचोळा व इतर केरकचरा रूईमध्ये आढळतो.

या बाबींचा धाग्याच्या गुणधर्मावर परिणाम तर होतोच त्याचबरोबर कापड गिरणीमध्ये प्रतवारी टिकविण्यास अडचण निर्माण होते. बऱ्याचदा ऑक्टोबर व नोव्हेंबर महिन्यातील अवकाळी पावसामुळे बऱ्याच शेतकऱ्यांचा वेचणीस आलेला कापूस भिजतो व त्यामुळे बरेच नुकसान होते. कापूस वेचणीच्या वेळी येणाऱ्या अवकाळी पावसाचा अंदाज घेऊन कापूस वेचणीचे नियोजन शेतकऱ्यांनी करावे. त्याचबरोबर कापूस साठवणूक पण खूप महत्वाची आहे.

कापसाची योग्य प्रकारे साठवण कशी करावी
१) प्रत्येक वेचणीनंतर कापूस सावलीत वाळवून नंतरच साठवावा.
२) कोरडवाहू कपाशीच्या पहील्या तीन वेचण्यांचा तसेच बागायती कपाशीच्या मधल्या चार वेचणींचा कापूस दर्जेदार असतो. हा कापूस शक्यतोवर वेगळा साठवावा
३) वेचणीच्या काळात पाउस पडल्यास पावसाने भिजलेला कापूस झाडावर सुकू द्यावा व पूर्ण वाळल्यानंतरच वेचणी करून वेगळा साठवावा.
४) शेवटच्या वेचणीचा कापूस कवडीयुक्त व किडका असतो. या कापसाला झोडा असे संबोधले जाते. अशा कापसाची रूई व धागा हा निकृष्ट दर्जाचा असतो. म्हणून असा कापूस वेगळा साठवावा.
५) कपाशीवर रसशोषण करणाऱ्या किडींचा प्रादुर्भाव जास्त असल्यास हा चिकट स्राव पानांवरून कापसावर पडतो व रूईची प्रत खालावते. परिणामतः बाजारभाव कमी मिळतो तसेच अशा प्रकारच्या रूईला मागणी नसते. त्यामुळे या कापसाची सुध्दा साठवण वेगळी करावी.
६) कापसाच्या गंजीत केरकचरा किंवा धुळीचे कण मिसळणार नाहीत याची काळजी घ्यावी.
७) पूर्णपणे कोरड्या कापसाची वेचणी करून तो कोरड्या ठिकाणी साठवून ठेवावा, उघड्या अंगणात साठविला असल्यास त्वरीत झाकून ठेवावा.
८) डागाळलेला व किडींमळे रंग बदललेला कवडीयुक्त कापूस वेगळा साठवावा. हा डागाळलेला कापूस चांगल्या कापसात मिसळू नये त्यामुळे चांगल्या कापसाची प्रत कमी होऊ शकते.
९) मोकळी हवा असलेल्या पक्क्या गोदामात साठवावा, ओलसर जागेत साठवणूक केल्यास त्या कापसास पिवळसरपणा येतो त्यामूळे रूई आणि धाग्याची प्रत खालावते.
१०) निरनिराळ्या कापूस वाणांची साठवण वेगवेगळ्या ठिकाणी करावी जेणेकरून त्याची सरमिसळ किंवा भेसळ होणार नाही याची दक्षता घ्यावी.
कापसात असलेल्या ओलाव्यामुळे कापसाच्या प्रतिवर परिणाम दिसून येतो. जास्त ओलावा असल्यास कापूस पिवळसर दिसतो. वाळल्या नंतर वजन केल्यास अवाजवी घट येण्यास कारणीभूत ठरते.

डॉ. संजय काकडे, डॉ. निळकंठ पोटदुखे व श्री. प्रशांत पाटील
कापूस संशोधन विभाग, डॉ. पं. दे. कृ. वि. अकोला

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *