भारत आणि ऑस्ट्रेलिया या दोन्ही संघांमध्ये ५ टी-२० सामन्यांची मालिका पार पडली. या मालिकेतील शेवटचा सामना जिंकत भारतीय संघाने ४-१ ने विजय मिळवला आहे. या मालिकेत भारताचा सलामीवीर फलंदाज ऋतुराज गायकवाडने मोठ्या विक्रमाला गवसणी घातली आहे. तो ऑस्ट्रेलियाविरुद्ध टी-२० मालिकेत सर्वाधिक धावा करणारा फलंदाज ठरला आहे. त्याने ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या ५ टी-२० सामन्यांमध्ये ५५.७५ च्या सरासरीने २२३ धावा केल्या आहेत.
ऑस्ट्रेलियाविरुद्ध टी-२० मालिकेत सर्वाधिक धावा करण्याचा रेकॉर्ड मार्टीन गप्टीलच्या नावे होता. आता ऋतुराजने गप्टीललाही मागे सोडलं आहे. गप्टीलसह ऋतुराजने विराट कोहली आणि डेवोन कॉनव्हे यांनाही मागे सोडलं आहे.
ऑस्ट्रेलियाविरुद्ध टी-२० मालिकेत सर्वाधिक धावा करणारे फलंदाज
ऋतुराज गायकवाड -२२३ धावा
मार्टिन गप्टील – २१८ धावा
विराट कोहली – १९९ धावा
डेवोन कॉनव्हे – १९२ धावा
टी -२० क्रिकेटमध्ये सर्वात जलद ४००० धावा करणारा दुसरा भारतीय फलंदाज..
याच सामन्यात ऋतुराज गायकवाडच्या नावे आणखी एका मोठ्या विक्रमाची नोंद झाली आहे. ऋतुराज गायकवाड हा सर्व टी -२० फॉरमॅटमध्ये मिळून सर्वात जलद ४००० धावा करणारा फलंदाज ठरला आहे. ऋतुराज गायकवाडने आतापर्यंत एकूण १२२ टी -२० सामने खेळले आहेत. यादरम्यान त्याने ४०३५ धावा केल्या आहेत. नाबाद १२३ धावा ही त्याची सर्वोत्तम खेळी आहे.