मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महापालिकेतील घोटाळ्यांवरून ठाकरे गटावर जोरदार हल्लाबोल केला होता. यानंतर आता ठाकरे गटाचे नेते आणि आमदार आदित्य ठाकरे यांनी सरकारवर टीका करताना, मुंबईची लूटमार दिल्लीच्या आदेशाने होत असल्याचे म्हटले आहे.
प्रसारमाध्यमांशी बोलताना आदित्य ठाकरे म्हणाले की, तुम्ही मुंबईची लूटमार दिल्लीच्या आदेशाने करत आहात. एमटीएचएलचे ८३ टक्के काम आमच्या सरकारमध्ये पूर्ण झाले आहे. आता उद्घाटनला एवढा वेळ लागत आहे. हे काम अजून तयार नाही? दीड महिना स्वतःच्या स्वार्थासाठी पेंडिंग ठेवले आहे. नवी मुंबई मेट्रोचा काम तसेच ५ महिने ठेवले आहे. दिघी स्टेशन ८ महिन्यांपासून तयार आहे. पण व्हीआयपी लोकांना उद्घाटनाला वेळ मिळत नाही. घटनाबाह्य मुख्यमंत्री यांना स्वतःच्या जिल्ह्यात उद्घाटन करता येत नाही, मग राज्यातील उद्घाटने काय करणार, असा थेट सवाल आदित्य ठाकरेंनी केला आहे.
आयुक्तांसोबत आम्ही यायला तयार आहोत. किती रस्ते झाले ते दाखवा?
मुंबईची लूट आम्ही होऊ देणार नाही. ज्या रोडचे कंत्राट रद्द केले ते कंत्राटदार कोर्टात गेले आहेत. नवीन रस्त्याचा निविदा काढली त्यात ३०० कोटी कमी केले आहेत. आधीचे कंत्राटदार कोर्टात गेले आणि नवीन टेंडर वर स्टे आणला आहे. ११ जानेवारीपर्यंत टेंडरवर स्थिगिती आहे. आयुक्तांसोबत आम्ही यायला तयार आहोत. किती रस्ते झाले ते दाखवा? अशी विचारणा आदित्य ठाकरेंनी केली.
दरम्यान, रस्ते पूर्ण होणार नाहीत याला जबाबदार आपले घटनाबाह्य मुख्यमंत्री आहेत. ट्रॅक्टर आणि कॉन्ट्रॅक्टरचा फरक मुख्यमंत्र्यांना कळत नाही, असा टोला आदित्य ठाकरेंनी लगावला.